हिवाळी अधिवेशन २०१९: शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या कामाला सुरूवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ashok-chvhan-Frame-copy-1.jpg)
महाईन्यूज | नागपूर
राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने कामाला सुरूवात केली असून, पुढील काळात त्याचे श्रेय घेता यावे, या एकमेव हेतूने भारतीय जनता पक्ष विधानसभेत गोंधळाचे राजकारण करीत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांप्रती फार कळवळा असल्याचे भाजप भासवत असला तरी तो साफ खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आ. चव्हाण यांनी शेतकऱ्यांबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, मागील पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. भाजपने शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणा केल्या होत्या व त्याची योग्य अंमलबजावणी केलेली नाही. अजूनही राज्यातील लाखो शेतकरी बोंडअळीची मदत, पीक विम्याची भरपाई आणि कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे. आज ते शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहेत. मात्र, त्यांच्या सरकारच्या काळात झालेली फसवणूक पाहता त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.