सीएए, एनआरसी विरोधात पुकारलेला राज्यव्यापी बंद मागे, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
मुंबई | महाईन्यूज
नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शु्क्रवारी 4 वाजता ही घोषणा केली. बंदला ठिक-ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा सुद्धा निषेध करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये दिवसभरात विविध परिसरातून 3 हजार पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
तत्पूर्वी व्हीबीएचे राज्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 पेक्षा अधिक संघटनांनी महाराष्ट्र बंदला समर्थन दिले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, पुण्यात या आंदोलनादरम्यान हिंसक वळणही लागले. यामध्ये दत्तवाडी आणि कोथरूड परिसरात वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. चेंबूजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सुद्धा फोडण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची तोडफोड औरंगाबादमध्ये सुद्धा दिसून आली आहे. मोकळे यांनी दावा केला, की बंद पाळण्यात आला तरीही महत्वाच्या ठिकाणी वाहतूक अडवली जाणार नाही. देशभर मोदी सरकारकडून एनआरसी आणि सीएए लागू करण्याची बळजबरी केली जात आहे. त्यालाच विरोध करताना हा बंद पाळण्यात येत असल्याचे ते पुढे म्हणाले आहेत.