सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/366766-cyber-crime-2.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
देशात सायबर गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ होत असून गेल्या वर्षी या गुन्ह्यांत तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक सायबर गुन्हे कर्नाटकात दाखल झाले असून महाराष्ट्र सायबर गुन्ह्यांत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, मुंबई शहर देशात दुसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून आले आहे.
देशातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राइम इन इंडिया २०१९’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये देशातील गुन्हेगारीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. देशात २०१९ मध्ये ५१ लाख ५६ हजार १७२ एकूण गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ४४ हजार ५५६ सायबर गुन्हे आहेत.
देशात २०१८ मध्ये २७ हजार २४८ सायबर गुन्हे घडले होते. या वर्षी ६३ टक्क्यांनी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहेत. सायबर गुन्ह्यात सर्वाधिक गुन्हे (२६,८९१) हे फसवणुकीच्या उद्देशाने झाले आहेत. यामध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर लैंगिक छळाच्या उद्देशाने दोन हजार २६६ दाखल झाले आहेत.