‘समोरची लोकं’ आपल्याला पावलोपावली अडचणीत आणतील, पण आपण सावध रहायला हवं – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
नागपूर – ‘समोरची लोकं आपल्याला पावलोपावली अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. त्यांना पावलावर पाऊल टाकण्याऐवजी पायात पाय अडकवण्याची सवय आहे. यामुळे आपण सर्वांनी सावध रहायला हवं’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदार बैठकीला उपस्थित होते.
काल त्यांना (विरोधकांना) एकदम सावरकरांचे प्रेम उफाळून आले पण अर्धवट सावरकर स्वीकारू नका. हे विषय सभागृहाबाहेरचे आहेत. सभागृहात आपण एकत्र राहिले पाहिजे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
सभागृहात काय करायचे ते तुम्हाला सांगितले आहे पण माझ्यासमोर बाहेरचंही आव्हान आहे. आज देशात अराजकता आहे. त्याचे महाराष्ट्रात पडसाद पडू नये याची काळजी घ्यायला हवी. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी काय करायचं आहे. काय करता येत नाही म्हणून वातावरण बिघडवलं जातंय पण आपण वातावरण बिघडू न देणं महत्वाचं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशातील वातावरण लक्षात घेता आपल्या मतदारसंघात काही होणार नाही याची काळजी घ्या असेही ते म्हणाले.