‘सत्य बाहेर येईल’ या भितीने एनआयएकडे तपास सोपवला – शरद पवार
मुंबई |महाईन्यूज|
‘एल्गार परिषदेत अन्यायाविरोधात तीव्र भाषणं केली गेली. या परिषदेत फक्त कविता वाचल्या गेल्या. अन्याय आणि अत्याचाराविरोधात सर्व जण बोलले. त्यांना माओवादी, देशद्रोही बोलून तुरुंगात टाकणे हे योग्य नाही, अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे नक्षलवाद नाही, तसेच सत्य बाहेर येईल या भितीने एनआयएकडे तपास सोपवला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.
एल्गार परिषद आणि त्यानंतर एक जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव इथे झालेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी व्हावी याची मला गरज वाटली म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले, असे पवारांनी सांगितले. तसंच, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक बोलवावी. समिती स्थापन करुन याप्रकरणाची फेरतपासणी करण्याची मागणी पवारांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणाचा तपास करण्याचा राज्य सरकारचा पूर्ण अधिकार आहे, असे शरद पववारांनी सांगितले. घाईघाईनं राज्य सरकारकडून तपास का काढून घेतला? एनआएच्या चौकशीवर शरद पवारांनी आक्षेप घेतला. सत्य बाहेर येईल या भितीने एनआयएकडे तपास सोपवला असल्याचा त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. गृहखात्याला जेवढे अधिकार तेवढेच अधिकार राज्यमंत्र्यांना नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसंच, भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवले नाही. याप्रकरणाचा योग्य तपास करुन कारवाई केली पाहिजे, असे शरद पवारांनी सांगितले