शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल : मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/13-1.jpg)
महाईन्यूज | नागपूर
शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल उचलत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात सांगितले आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही, असं ते म्हणाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 हजार कोटींची गरज असल्याच्या मुद्याचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केलेली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या 23 हजार कोटींच्या मदतीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही जणांना बोलायची सवय असते, त्यांना बोलू द्या आणि मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही व आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधिल आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचं असलं, तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार का? या प्रश्नावर ठाकरे यांनी नाव देणार का? नाही तर नाव दिलं आहे असं म्हणतं या नामकरणावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात जर कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, या प्रकरणात जो कोणी जबाबदारी असेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे.