शिकवणीचालकाकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवकास अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Untitled-5.jpg)
- अन्य एका नगरसेवकासह चौघे फरार
लातूर शहरातील एका शिकवणीचालकाचे अपहरण करून त्याच्याकडे तब्बल २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी काँग्रेसच्या एका नगरसेवकास गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. याप्रकरणात अन्य एक नगरसेवक व चौघे फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच अविनाश चव्हाण या शिकवणीचालकाचा खून झाल्याची घटना घडली होती.
एका परप्रांतीय शिकवणीचालकास १० डिसेंबर रोजी काँग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के, पुनित पाटील, व्ही. एस. पँथरचे अध्यक्ष विनोद खटके व अन्य तिघांनी शहराबाहेर नेऊन बेदम मारहाण केली. शिवकणीवर्ग चालवण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी त्याच्याकडे मागण्यात आली. याची वाच्यता केल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकू, अशी धमकीही खंडणीखोरांनी शिकवणीचालकास दिली. मात्र शिकवणीचालकाने धाडस दाखवून शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेतली व त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यापूर्वी ६ लाख ६६ हजार रुपये आपण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन सांगळे यांनी संबंधित प्राध्यापकाला दिलासा दिला व त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा नगरसेवक सचिन अशोक मस्के यास अटक केली. नगरसेवक पुनित पाटील, व्ही. एस. पँथरचे अध्यक्ष विनोद खटके व इतर तिघे मात्र फरार आहेत. पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खंडणीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे सांगितले.
शिकवणीचालक भयभीत
लातूर शहरात खासगी शिकवण्यांचे मोठे पेव असून स्थानिक लोकांबरोबरच आता परप्रांतीय प्राध्यापकही येथे खासगी शिवकणीवर्ग घेतात व त्यांची कोटय़वधींची कमाई आहे. अविनाश चव्हाण या शिकवणी वर्गचालकाचा याच प्रकारातून खून झाला होता. त्यानंतर शिकवणी वर्गचालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिकवणी वर्गाच्या परिसरात हाणामाऱ्या, छेडछाडीचे प्रकार व लुटीचे प्रकारही घडत असल्यामुळे तेथे आता रीतसर पोलीस चौकी सुरू करण्यात आली असून ५२ उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.
काँग्रेस पक्षाची अडचण
२५ लाख रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात थेट काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली. त्यामुळे आता आगामी काळात हे प्रकरण काँग्रेसच्या मंडळींवर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.