शरद पवार उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर; नुकसानीची करणार पाहणी
उस्मानाबाद |महाईन्यूज|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा अधिकृत दौरा जाहीर करण्यात आला आहे. 18 व 19 तारखेला जिल्ह्यातील तुळजापुर, उमरगा व परंडा तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे नियोजन या दौऱ्यामध्ये करण्यात आले आहे. पवार हे तुळजापूर येथेच मुक्कामी राहणार असून दौऱ्यामध्ये तुळजापुरला अधिक वेळ दिल्याचे दिसुन येत आहे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार जिल्ह्यामध्ये येत आहेत. शेतकरी या संकटामुळे पुरता कोसळला असुन त्यावेळी स्वतः श्री. पवार यांनी भेट देण्याचे नियोजन केल्याने शेतकरी वर्गालाही दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी सध्या राज्याच्या सत्तेत अग्रभागी आहे. त्यातही श्री. पवार यांच्या शब्दाला या सरकारमध्ये सर्वाधिक किंमत असल्याचे आजवर पाहयला मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यांने निश्चितपणाने काही ना काही हाती लागल्याशिवाय राहणार अशी भावना व्यक्त होत आहे. श्री. पवार देशाचे कृषीमंत्री होते. त्यावेळी गारपीठीने शेतकरी उध्द्वस्त झाला होता. तेव्हाही श्री. पवार पहाटेच चिखल तुडवित नुकसान झालेल्या पिकाचे पाहणी करत होते. त्यानी तेथूनच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोनवरुन परिस्थितीची माहिती दिली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना श्री. पवार यांनी मदतीचा हात दिला होता. यामुळे आताही ते अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पवार सकाळी रविवारी सव्वा नऊ वाजता तुळजापूर येथे येणार आहेत. तिथून ते उमरगा तालुक्यातील तसेच तुळजापुर तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देणार आहेत. एक ते पावणेदोन एवढी वेळ राखून ठेवली आहे. पावणे दोन ते साडेपाच पर्यंत ते औसा, उस्मानाबाद व तुळजापूर येथील गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर तुळजापूर येथील विश्रामगृहावर ते मुक्कामी राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत पुन्हा तुळजापुर तालुक्यातील उर्वरीत गावांना भेटून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पावणेबारा वाजता पत्रकाराशी संवाद साधुन तुळजापूर येथुन परंडयाकडे जाणार आहेत. साडेबारा वाजता परंडा तालुक्यातील गावांना भेटी देऊन दुपारी दोन ते अडीच हा काळ राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वाजता ते परंडा येथुन बारामतीला रवाणा होणार आहेत. यामध्ये त्यानी तुळजापुर तालुक्याला अधिक वेळ दिल्याचे लक्षात येत आहे.