विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये घ्या; आमदारांची मागणी
कोल्हापूर – मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्याचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी करतील. त्या भेटीत मुख्यमंत्री जी भूमिका मांडतील, त्यावर सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे, असा निर्णय सकल मराठा समाजाने आज आयोजित केलेल्या आमदार, खासदारांच्या बैठकीत झाला. शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून मराठा तरुण आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. नोव्हेंबरपर्यंत ते वाट पाहणार नाहीत. त्यामुळे शासनाने सप्टेंबरमध्ये तातडीने विशेष अधिवेशन घ्यावे. मराठा आरक्षण कसे देणार, ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा अंतर्भाव कसा करणार, हे मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरच्या अधिवेशनात सांगावे, शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा चार सप्टेंबरला आम्ही कोल्हापुरातून हजारो गाड्या घेऊन मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून अरबी समुद्रात आमच्या मागण्यांच्या निवेदनांचे विसर्जन करू. या वाहनांच्या मोर्चाचे नेतृत्व जिल्ह्यातील सर्व आमदारांनी करावे, असा प्रस्ताव सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी बैठकीमध्ये ठेवला.
मंत्रालयावर चारला वाहनांचा मोर्चा
दिलीप देसाई म्हणाले, ‘‘आमदारांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री काय लेखी आश्वासन देतात. त्यावर सकल मराठा समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. तोपर्यंत दसरा चौकातील ठिय्या आंदोलन सुरूच राहील व चार सप्टेंबरचा वाहनांचा मोर्चाही कायम असेल.’’