विजेवरील वातानुकूलित शिवाई बससाठी मार्च २०२० पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-43.png)
मुंबई | महाईन्यूज |
एसटीच्या शिवाई या विजेवरील वातानुकूलित बससाठी मार्च २०२० पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.या बस सेवेचा लोकार्पण सोहळा सप्टेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. मात्र बस गाडय़ांसाठी आवश्यक असलेली चार्जिगची सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या विलंबामुळेच त्या सेवेची प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
केंद्र सरकारकडून विजेवर धावणाऱ्या बस गाडय़ांना प्राधान्य दिले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी विजेवर धावणाऱ्या बस एसटीला फायदेशीर ठरतील आणि त्या चालवण्याचा विचार करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार पर्यावरणस्नेही प्रवासासोबत इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस गाडय़ा आणण्याचा निर्णय घेतला. विजेवरील पहिल्या वातानुकूलित बसचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९मध्ये झाले होते. तेव्हा ही बस शिवाई नावाने ओळखली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
अशा १५० बस गाडय़ा दाखल करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० बस येतील, अशी माहितीही महामंडळाने दिली. मात्र सध्या दोन बस गाडय़ाच ताफ्यात दाखल झाल्या आहेत. विजेवरील बस असल्याने त्या जास्तीत जास्त ३०० किलोमीटपर्यंतच धावू शकतात. यामुळे महामंडळाने शिवाई बसचे कमी अंतरावरील प्रथम तीन मार्ग निश्चित केले. यात स्वारगेट ते कोल्हापूर, शिवाजीनगर ते नाशिक आणि शिवाजीनगर ते औरंगाबाद यांचा समावेश आहे.