लॉकडाऊनचा मोठा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना; डाळिंबाचे भाव 5 रुपये किलोवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/08panchvati_202008470638.jpg)
यंदा कोरोनामुळे वेगवेगळ्या उद्योग धंद्यांना चांगलाच फटका बसलाय. शेती क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेलं नाही. कोरोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका जालना जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. लॉकडाऊन काळात फळं विक्रीसाठी तयार असूनही मालाची वाहतूक बंद असल्याने झाडांना लगडलेले डाळिंब गळून पडले आहेत. फळांचा दर्जाही खराब झालाय. त्यामुळे डाळिंब व्यापारी थेट बांधावरुन 100 रुपये प्रती कॅरेट प्रमाणे डाळिंबाची जागेवरुन खरेदी करतायेत.
यंदा जगभरातल्या कोरोना व्हायरसमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी रोजच्या खर्चालाही महाग झाला आहे. कोरोनाने यंदा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर थेट जुलै-ऑगस्ट महिन्यातच संक्रांत आणलीय. लॉकडाऊन काळात राज्यभरात वाहतूक बंद होती, याचा फटका आंबिया बहार धरणाऱ्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. लॉकडाऊन काळात वाहतूक बंद असल्याने एकही व्यापारी बागेत डाळिंब खरेदीसाठी फिरकला नाही. परीणामी जून-जुलै महिन्यात पिकलेल्या डाळिंबाला झाडावरच तडे गेले. अनेक फळं पिकून जमिनीवर गळून पडले. तर इतर सर्व डागाळले. त्यामुळे बांधावर खरेदी झालेल्या या डाळिंबाच्या 22 किलोच्या कॅरेटचा आजचा बाजारभाव फक्त 100 रुपये प्रति कॅरेट आहे