लायकी नसणारे लोकांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका-विक्रम गोखले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Vikram-gokhle.jpg)
लायकी नसणारे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतात असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे. आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हेदेखील उपस्थित होते.
काही लोक लायकी नसताना वीर सावरकर यांच्याबाबत बोलतात. त्यांच्या जयंती दिनाच्या दिवशी सावरकर नायक की खलनायक अशी चर्चा घेण्यात आली. असा कार्यक्रम घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असंही वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं. मागासवर्गीयांना जवळ करा असे म्हणण्याचे धैर्य वीर सावरकर यांनी त्याकाळी दाखवले होते. अशा माणसाच्या देशभक्तीवर शंका कशी काय घेतली जाऊ शकते? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर वीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांवर बोलणाऱ्यांसाठी माझ्याकडे वेळच नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
या कार्यक्रमात त्यांनी काश्मीर प्रश्नावरही आपले मत मांडले. काश्मीर प्रश्न दिल्ली आणि इस्लामाबादला सुरुच ठेवायचा आहे, तिथल्या नागरिकांना मात्र शांतता हवी आहे. हा प्रश्न लढाईने सुटणार नाही. ज्यांना युद्ध हवं आहे त्यांनी इतिहासातून अनुभव घेतला नाही असेही गोखले यांनी म्हटले आहे.
याआधी एप्रिल महिन्यातही त्यांनी एक आक्रमक वक्तव्य केलं होतं. लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्याचं थोबाड फोडलं पाहिजे अशी प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी दिली होती. २९ एप्रिल रोजी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विक्रम गोखले यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी सावरकर यांच्याबद्दल बोलण्याची लायकी नसणारे लोक बोलत आहेत असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं.