राष्ट्रवादी- मनसे एकत्र येणार का?, अजित पवार म्हणतात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/raj-thackeray-ajit-pawar.jpg)
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची चर्चा सुरु असून ४८ पैकी ४० जागांवर आमचे एकमत झाले आहे, अन्य ८ जागांसाठी चर्चा सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. तर मनसेला सोबत घेणार का, असा प्रश्न विचारला असता समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे विधान करत अजित पवारांनी अधिक भाष्य करणे टाळले.
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पार पडला. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार का?, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. याबाबत राज ठाकरे आणि शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलेले नाही. या प्रसंगी अजित पवारांनी पत्रकारांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. समविचारी पक्षांना बरोबर घेऊ असे विधान करत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. निवेदिता माने यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, निवेदिता माने यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद दिले. त्यांना पक्षाने सर्व काही दिले असताना त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र आमची तेथील जागेबाबत मित्र पक्षासोबत बोलणी सुरू होती, असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावरही टीका केली. ‘पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले. यंदा प्राधिकरणाने पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर मुख्यमंत्री त्यांच्या विशेष अधिकारात पाण्याचा निर्णय घेऊ शकतात. मागील साडे चार वर्षातील कारभार पाहता सध्याचे राज्यकर्ते पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले असून पालकमंत्र्यांमध्ये इच्छा शक्ति नसून जेव्हा तहान लागणार तेव्हा विहीर खोदू नका असे त्यांनी सांगितले.