राम मंदिराबाबत सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार : अमित शाह
राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक तसेच अध्यादेश आणणार नाही. या प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जानेवरी महिन्यांत होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीची वाट पाहिली जाईल, असे भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.
एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना अमित शाह यांनी भाजपाची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, भाजपा आणि सरकार सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीची वाट पाहणार आहे. जानेवारी महिन्यांत सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर सर्वकाही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे. दरम्यान त्यांनी काँग्रेसवर राम मंदिरावरुन टीका केली.
गेल्या नऊ वर्षांपासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपाने या प्रकरणाची सुनावणी टाळली जावी असे कधी कोर्टात म्हटलेले नाही. जर हे आमच्या हातात असते तर या प्रकरणावर कधीच तोडगा निघाला असता, असेही यावेळी शाह म्हणाले.
अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही शाह यांनी निशाणा साधला. उद्धव आपल्या जीवनात पहिल्यांदाच अयोध्येला गेले आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि संत समाजाकडून हिवाळी अधिवेशनात राम मंदिरासाठी कायदा करावा किंवा त्यानंतर अध्यादेश आणून राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात याबाबत विधेयक सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या चर्चेला शाह यांनी पूर्णविराम दिला आहे.