राज्यात महाशिवआघाडीचं सरकार
मुंबई: शिवसेनेकडून सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, आदेश बांदेकर या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आणि ७ अपक्ष अशा १६२ आमदारांचे संख्याबळ असल्याचे पत्र राज्यपालांना दिले. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फुटली असून महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार, हे स्पष्ट झाले आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या पालखीतही शिवसैनिकच बसणार, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेसने सत्तेत सहभागी न होता शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सरकार चालवतील. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कमालीची बदलणार आहेत.