राज्यातील ‘हे’ 7 जिल्हे ‘कोरोना’ संकटांपासून सुरक्षित
देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे हा वाढता आकडा चिंतेचा विषय ठरतोय…राज्यातील सात जिल्हे मात्र या संकटांपासून सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे…कोरोनानं त्या ठिकाणी शिरकाव करु नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. आतापर्यंत मुंबई, पुण्यात बाधितांचा आकडा वाढत असताना परभणी, नंदूरबार, नांदेड, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही.
स्थानिक प्रशासन हे खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहेत अशांना क्वारंटाइन करणं, इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांची अधिक काळजी घेणं, जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करणं, मोबाईल क्लिनिक स्थापन करणं, सीमा बंद करणं असे खबरदारीचे उपाय या जिल्ह्यांत राबवले जात आहेत.
सध्या परभणीत ३३३ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यातल्या २८९ लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत तर ३५ लोकांचे अहवाल येणं बाकी आहे अशी माहिती परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. नांदेडमध्ये विविध शहरातून आलेल्या ७० हजार लोकांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती नांदेडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. वर्ध्यामध्येदेखील दोन मोठ्या भाजीमंडई या १८ मैदानाच्या ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. सुरक्षित अंतराचा नियम येथे काटेकोरपणे पाळला जात आहे.