राज्यभरातील रिक्षाचालक ९ जुलैला जाणार संपावर
रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करण्याच्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांमधील रस्त्यांवर ९ जुलैला रिक्षा धावणार नाहीत. परिणामी रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊनही काहीच उपयोग न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीन देण्यात आली आहे.
रिक्षा चालकांच्या संपामगे असलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये , चार ते सहा रुपये भाडेवाढ करावी, बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी, ओला-उबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी, चालक-मालकांना पेन्शन, ग्रॅज्युईटी, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी, रिक्षा चालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे आदींचा समावेश आहे.