येस बँकेच्या खातेधारकांची ATM मध्ये धाव, मात्र पैसेच नाही
मुंबई |महाईन्यूज|
रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांमुळे खातेधारकांना महिन्याभरासाठी ५० हजारांची रक्कम काढता येणार आहे. निर्बंधांमुळे ग्राहकांमध्ये घबराट असून, काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी तातडीनं एटीएममध्ये धाव घेतली. त्यामुळे मुंबईतील अनेक एटीएमबाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या तर काही एटीएममध्ये पैसेच उपलब्ध नसल्यानं गोंधळ झाला.
दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल जवळील येस बँकचं एटीएम बंद करण्यात आलं. इथली मशिन वापरात नसल्याचं सांगण्यात आलं आहे, पुढचे काही तास ते मशिन बंद ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
चेंबूरमधील एटीएम मशीनमध्ये पैसे तर आहेत मात्र एटीएमबाहेर मोठी रांग पाहायला मिळत आहे. अनेक ट्रान्झॅक्शन करुन पैसे काढावे लागत आहेत, असं इथल्या खातेधारकानं सांगितलं. तर निर्बंध जाहीर झाल्यापासून अनेक एटीएमध्ये पैशांच्या तुटवडा जाणवू लागला आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून बँक येस बँकेवर कर्जाचा बोजा आहे. बँकेच्या ताळेबंद हा चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचेही समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयने बँकेवर निर्बंध घातले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते. यावेळी या बँकेतील खातेधारकांमध्ये चांगलाच संताप उसळल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता येस बँकेवर केलेल्या कारवाईमुळे या बँकेतील ग्राहकांची चिंता वाढली आहे.