मोदी अन् शहांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/smr_201904229820.jpg)
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. काँग्रेस पक्षातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली असून मोदी अन् शहांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोन दिग्गज नेत्यांकडून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या खंडपीठाने देव यांच्या याचिकेवर सुनावणी करणार असल्याचे म्हटले आहे. देव यांचे ज्येष्ठ वकील, अभिषेक मनु संघवी यांनी दाखल केलेल्या याचिकेतून मोदी आणि अमित शहांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण आयोगाकडून कुठलिही कारवाई होत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, आपल्या भाषणात सैन्यातील जवानांचा वापर करत आचारसंहिता भंग झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सुष्मिता देव यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यानुसार न्यायालयाकडून मोदी आणि अमित शहांवर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले जाऊ शकतात.