मुतारीत नाक मुठीत!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Untitled-5-42.jpg)
दुर्गंधीविरहित मुतारी योजना रद्द; खर्चाचे कारण देत पालिकेचे घूमजाव
वापरकर्त्यांकडून केली जाणारी अस्वच्छता आणि देखभालीवर येणारा खर्च यामुळे मुंबईत येथून पुढे दुर्गंधीरहित मुतारी बांधण्याची योजना महापालिकेने रहित केली आहे.
मुंबई शहरातील काही भागांसह मुख्यालयात दुर्गंधीरहित इकोफ्रेंडली मुताऱ्या पालिकेने बांधल्या होत्या, मात्र वापरकर्त्यांकडून या मुताऱ्यांमध्येही सर्रास पानाच्या व गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्या जातात. याशिवाय या मुताऱ्यांच्या देखभालीचा खर्चही जास्त असल्याने यापुढे अशा मुतारी न उभारण्याचा निर्णय मुंबई मनहागनरपालिकेने घेतला आहे.
सार्वजनिक मुताऱ्यांबरोबरच सरकारी, महानगरपालिका कार्यालय, शाळा, मॉल, चित्रपटगृहे आदी ठिकाणी असलेल्या मुताऱ्यांमध्ये पाण्याचा वापर कमी होतो. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी असते. म्हणून अशा ठिकाणी दुर्गंधी होणार नाही, अशा विशेष मुताऱ्या उभारण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती.
याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात दोन वर्षांपूर्वी एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार पालिकेने शहरातील काही सार्वजनिक शौचालयांसह शिवाजी मंडई, महानगरपालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात दुर्गंधीरहित मुतारी प्रायोगिक तत्त्वावर उभारली.
महानगरपालिकेच्या या निर्णयाला नगरसेवकांनी विरोध केला आहे. मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहायचे असेल तर अशा मुतारीवर भर द्यायला हवा, असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरला आहे. याबाबत महानगरपालिका सभागृहात आवाज उठवण्यात येणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे.
मुताऱ्यांमध्ये पानाच्या पिचकाऱ्या
दुर्गंधीरहित प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांसह सरकारी कार्यालयांत दुर्गंधीरहित मुतारी उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण अवघ्या दोनच वर्षांत याही मुताऱ्या अस्वच्छ होत असल्याचे आढळून आले. या मुताऱ्यांमध्येही लोक पान खाऊन थुंकतात. त्यामुळे त्या तुंबत आहेत. मुताऱ्यांमध्ये दुर्गंधी भरून राहत असल्याने त्यांचा वापर करणे लोक टाळू लागले आहेत. मुतारी स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला ‘काटिर्र्ज’ ठरावीक काळानंतर बदलावे लागते. या ‘काटिर्र्ज’ची किंमत सुमारे दोन ते तीन हजार रुपये असून ती वारंवार बदलावी लागत असल्याने पालिकेला परवडणारी नाही. त्यामुळे अशा मुतारी सार्वजनिक शौचालयात बसवणे योग्य नसल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर अशा मुताऱ्या यापुढे न बसवण्याची सूचनाही त्यांनी नगरसेवकांनी मंजूर केलेल्या ठरावावर केली आहे.