मुंबई- दिल्ली दरम्यान 1 लाख कोटी रूपयांचा नवा एक्स्प्रेस वे बांधणार- गडकरींची घोषणा
मुंबई- दिल्ली (गुरगाव) ते मुंबई असा दीड हजार किलोमीटरचा नविन एक्स्प्रेस वे बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुढील तीन वर्षात (डिसेंबर 2021) पर्यंत या महामार्गाचे बांधकाम पूर्ण होईल व यासाठी 1 लाख कोटी रूपये खर्च येईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, देशाची राजधानी दिल्ली ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे अंतर (व्हाया रोड) 24 तासावरून 12 तासांवर येईल असे सांगण्यात आले. सोबतच थेट व सरळ रस्ता बांधला जाणार असल्याने 1450 किमी अंतरावरून 200 किमी अंतर कमी होऊन 1250 किमीवर हे अंतर येईल अशी माहिती देण्यात आली.
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे मुळे पाच-सहा राज्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा आदी राज्यांतून हा मार्ग जाईल. या मार्गामुळे हरयाणातील सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या मेवातला फायदा होईल. असाच फायदा गुजरातमधील दाहोड जिल्ह्याला होईल.
हा मार्ग मुंबई- दहिसर- सुरत- बडोदा- गोध्रा- रतलाम- कोटा- मेवात- गुरगाव- दिल्ली असा राहील. जुने महामार्गाचे रूंदीकरण करण्यापेक्षा नवे एक्स्प्रेस वे बांधणे योग्य ठरेल. काळानुसार हे मार्ग ग्रीनफील्ड असतील. तसेच अविकसित भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. राजस्थान व मध्यप्रदेशला याचा सर्वाधिक फायदा होऊ शकणार आहे. या दोन राज्यादरम्यान चंबल एक्स्प्रेस बांधला जाणार जो मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसला जोडलेला असेल.
येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या रस्त्याच्या कामाला सुरूवात होईल व एकाच वेळी 40 ठिकाणांपासून रस्ता बांधणीचे काम सुरू राहील असेही गडकरी यांनी सांगितले. डिसेंबर 2021 पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जमिन संपादित करण्यासाठी 600 कोटी रूपये जमिन मालकांना व शेतक-यांना दिले जाणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर-
मुंबई-दिल्ली दरम्यान एक्स्प्रेस वे ची बांधणी ग्रीनफील्ड पद्धतीने होणार आहे. सोबतच भविष्यातील वाहतूकीची गरज म्हणून जागा संपादित करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार या मार्गाच्या आसपास इंडस्ट्रियल कॉरीडॉर बांधला जाणार आहे. त्यामुळे या भागात उद्योगधंदे वसले जातील व लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होईल असे नियोजन केले आहे.