मराठा क्रांती मोर्चा : मुंबई बंद मागे, शांततेचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/maratha.jpg)
मुंबई – आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. अनेक ठिकाणी बंदनं हिंसक वळण घेतलं होतं. काही ठिकाणी दुकानं फोडण्यात आली, रिक्षांची तोडफोड करण्यात आली, महामार्ग रोखून धरण्यात आले, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तसेच बसेसचंही नुकसान करण्यात आलं. अखेर दुपारी अडीचच्या सुमारास हा बंद मागे घेण्यात आल्याचं आयोजकांनी जाहीर केलं आहे.
मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत सरकारने जाहीर केलेली ७२ हजार जागांवरील नोकरभरती स्थगित करावी या व अन्य मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले. मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत बुधवारच्या मुंबई बंदचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारच्या बंदमधून काही जिल्हे वगळण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये बंद पुकारण्यात आला.