‘मग, दुकान बंद करायचं का, काॅंग्रेस महिला नेत्यांचा बोचरा सवाल
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भोपळाही न फोडू शकणाऱ्या काँग्रेसमध्ये खळबळ माजलीय. या निवडणुकीत पक्षाच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झालीय. दरम्यान, माजी केंद्रीय अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, पक्षातील नेत्यांकडून चिदंबरम यांना घरचा अहेर मिळालाय. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘मग, दुकान बंद करायचं का?’ असा बोचरा सवाल पी चिदंबरम यांना विचारलाय. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनी ‘तुमच्या उदयानंतर काँग्रेसला आपली व्होट बँक परत मिळाली नाही’ अशी धारदार टीका केलीय.
दिल्लीच्या निकालाननंतर पी. चिदंबरम यांनी आपचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधला होता. ‘आपचा विजय झाला, थापा मारणारे आणि दिशाभूल करणारे हरले. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या दिल्लीकरांनी भाजपचा फूट पाडणारा आणि धोकादायक अजेंडा हाणून पाडला’ असं म्हणत ट्विटरवर आनंद व्यक्त केला होता. परंतु, त्यांची ही प्रतिक्रिया काही पक्षातील नेत्यांना रुचलेली दिसत नाही.
आम आदमी पक्षाला विजयाच्या शुभेच्छा देणाऱ्या चिदंबरम यांच्या या ट्विटला रिट्विट करत शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘आपच्या विजयावर गर्व का?’ असा सवाल केला. ‘सर, योग्य सन्मानानं केवळ एव्हढंच जाणून घेण्याची इच्छा आहे की, भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस पक्ष स्थानिक पक्षांना आऊटसोर्स करत आहे का? याचं उत्तर नाही असं असेल तर मग आपण आपल्या पराभवावर मंथन करण्याऐवजी आपच्या विजयावर गर्व का करत आहोत? आणि याचं उत्तर होय असं असेल तर मग आपण आपलं दुकान बंद करावं!’ अशी जहरी टीका शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केलीय.