भीमा कोरेगावप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे द्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/bhima-1.jpg)
पुणे – “एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव येथील घटनेच्या अनुषंगाने होत असलेला तपास चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. तपासावर राजकीय दबाव येत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, वकिलांसह बुद्धिजीवींना अटक केली आहे. यूएपीए गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नाही. त्यामुळे हा तपास “नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ (एनआयए) कडे सोपविण्यात यावा,’ अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यावर सोमवारी (दि.3) युक्तीवाद होणार आहे.
सतीश गायकवाड (वय 35, रा. दापोडी) यांच्यावतीने अॅड. तौसिफ शेख आणि ऍड. कुमार कलेल यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, “विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास करत असताना, राजकीय दबाव येत आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नाही,’ असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. पुणे पोलीस कोरेगांव भीमा घटनेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांना अटक झाली होती. त्याच्यावर अजूनही आरोपपत्र दाखल नाही. पण, त्यानंतर एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याच्या अनुमानापर्यंत पुणे पोलीस अचानक पोहचले आहे,’ असे मुद्दे या याचिकेत मांडले आहेत.