भाजप अपयशी ठरल्याने राज्यात सत्तांतर अटळ – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
सांगली – जाहिरातबाजीत अडकलेले केंद्र आणि राज्यातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने आता राज्यात सत्तांतर अटळच आहे. मुख्यमंत्री बदलाची मलमपट्टी उपयोगाची नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.
हरिपूरमधील रामकृष्ण वाटिका येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, जयश्री पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, “” देवेंद्र फडणवीस गेल्या वीस वर्षातील संख्याबळाच्या दृष्टीने “पॉवरफुल्ल मुख्यमंत्री’ आहेत. कारण त्यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. युती नाममात्र आहे. शिवसेनेची अवस्था रोजच्या कुरबुरीतून दिसते. तरीही त्यांचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मिळालेल्या चांगल्या जनाधाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे
लोकांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना आहे. म्हणून राज्यात नेतृत्व बदलाची भाषा सुरु आहे. ती शिवसेनेने सुरु केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या भेटीत काय झाले माहिती नाही, पण त्यानंतर नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सरकारच्या शेवटच्या काळता मुख्यमंत्री बदलला तरीही येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत राज्यात परिर्वतन अटळ आहे.” असेही ते म्हणाले.