ब्राह्मणी भाजपाविरुद्ध दलित आंदोलनाचा नक्षलवाद्यांचा कट – पुणे पोलीस
नक्षलवाद्यांनी ब्राह्मणी भाजपाविरुद्ध दलित आंदोलनाचा कट रचल्याचा मोठा खुलासा पोलिसांनी केला आहे. देशभरात नक्षलवादी समर्थकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर घेणयात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सापडलेल्या काही पत्रांमधील संवाद वाचून दाखवला. यामधील एका पत्रात भीमा कोरेगाव दंगलीमध्ये महत्त्वाची ठरलेल्या एल्गार परिषद यशस्वी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे यांनी रोना विल्सन यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. पत्रात लिहिलं होतं की, ‘कॉम्रेड मंगलू आणि दिपू दोन महिन्यांपासून कॉम्रेड सुधीरसोबत कोरेगाव भीमा संबंधी संपर्कात होते. राज्यातील अनेक दलितांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश मिळालं आहे. कॉम्रेड सुधीर यांना यासाठी फंड पुरवण्यात आला आहे. फंड पुरवण्याची पुढील जबाबदारी कॉम्रेड शोमा आणि कॉम्रेड सुरेंद्र यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोरेगाव भीमा आंदोलनाचा चांगला परिणाम झाला आहे. एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला असून पुढील आंदोलनासाठी आणि उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी त्याचा फायदा घेतला पाहिजे. दलितांच्या भावना नक्कीच भाजपा आरएसएसच्या ब्राह्मण अजेंडाविरोधात आहेत. याचा फायदा घेत राज्यात आंदोलन आणखी उग्र केलं जाऊ शकतं’.
२ जानेवारी २०१८ रोजी हे पत्र लिहिण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद तेलतुंबडे सेंट्रल कमिटीचे सदस्य असून सध्या अंडरग्राऊंड आहेत.
देशभरात कथित नक्षलींवर करण्यात आलेल्या कारवाईचं समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट होता असं सांगितलं. हजारो कागदपत्रे पाच माओवाद्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचे ते म्हणाले.
वरावर राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्साल्विस यांना झालेल्या अटका अत्यंत योग्य होत्या परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्याचे ते म्हणाले. देशभरात नऊ ठिकाणी छापे घालण्यात आले, हजारो कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली, कम्प्युटर्स व लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेण्यात आल्याचे परमवीर सिंग म्हणाले. या सगळ्या कागदपत्रांवरून शस्त्रसाठा विकत घेण्याचा, नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा तसेच मोदी सरकार उलथवण्याचा कट होता असे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्षलींशी असलेल्या संबंधांवरुन 29 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापे मारले होते. सर्व छाप्यांचे व्हिडीओ शूटींग केल्याचे पोलिसांनी सांगितले. ई-मेल, पत्रे व अन्य साहित्यातून मोठ्या षडयंत्राची माहिती समोर आली आहे असे त्यांनी सांगितले. सगळ्यांचे माओवाद्यांशी संबध असल्याचे स्पष्ट झाले असून आमच्याकडे पुरावे आहेत असं ते म्हणाले. कॉम्रेड सुदर्शन यांनी कॉम्रेड गौतम नवलखा यांना लिहिलेलं पत्रही पोलिसांनी वाचून दाखवलं आणि मोदी सरकार उलथवण्याचे प्रचंड मोठे षडयंत्र राबवण्याचा कट आखला जात होता असे पोलिसांनी सांगितले. घेतलेले निर्णय सीपीआय माओवादीच्या सेंट्रल कमिटीला कळवलं जायचं असे त्यांनी सांगितले.
रोना विल्सन यांनी 4 लाख राऊंड, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा उल्लेख असलेलं पत्र कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलं होतं. यामध्ये राजीव गांधीसारखा घातपाताचा उल्लेख होता व मोदींच्या हत्येचा कट होता असं सांगितलं. अन्य देशांमदील संघटनांशी हे माओवादी संपर्कात होते आणि मोठा घातपात घडवण्याचा कट होता असे सांगितले. कॉम्रेड सुधा भारद्वाज यांचंही आक्षेपार्ह पत्र पोलिसांनी वाचून दाखवलं. मिलिंद तेलतुंबडेंनी रोना विल्सन यांना पत्र लिहिलं होतं यामध्ये भीमा कोरेगाव दंगलीमध्ये महत्त्वाची ठरलेल्या एल्गार परिषद यशस्वी झाल्याचा उल्लेख केला तसेच भाजपाच्या व आरएसएस शासित राज्यात आंदोलन आणखी उग्र करण्याचा उल्लेख आहे. तसेच भाजपाच्या ब्राह्मणी कार्याविरोधात दलितांचं आंदोलन उभं करण्याचाही उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. या पाचही जणांना आम्हाला कोठडी हवी असून या सगळ्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्याकडे चौकशी करण्याची गरज असल्याचे परमवीसिंह म्हणाले.