प्लॅस्टीकबंदीनंतर परराज्यातून येणा-या प्लॅस्टिकवर आता “वॉच’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/plastic-ban-3.jpg)
मुंबई – पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी तसेच मानवी आरोग्यास धोकादायक ठरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तसेच थर्माकोलच्या वस्तूंवर शनिवारपासून राज्यात बंदी घालण्यात आली. राज्य सरकारने ही बंदी घातली असली तरी आता परराज्यातून विशेषतः नजिकच्या गुजरातमधून येणा-या प्लॅस्टिक उत्पादनांवर “वॉच’ राहणार आहे. प्लॅस्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी अधिका-यांनी ठिकठिकाणी धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्राला 80 ते 85 टक्के प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा हा गुजरातमधूनच होत होता. महाराष्ट्रात त्यांचे फार कमी उत्पादन होत होते. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी आता परराज्यांतून विशेषतः गुजरातमधून येणा-या या प्लॅस्टिक पिशव्यांच्या पुरवठ्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गुजरातमधून तयार होउन हा माल मुंबईच्या पश्चिम उपनगरात येतो. तिथले व्यापारी नंतर याचे वितरण करत असतात. म्हणून या भागावरही आता लक्ष ठेवण्यात येणार आहे.
प्लॅस्टिक बंदीसाठी आमचा मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच प्लॅस्टिकचे उत्पादनच आम्ही रोखणार आहोत.यामुळे सर्वसामान्यांना ते उपलब्धच होणार नाही.यामुळे सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची वेळच येणार नाही.या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.
जाहिरातींद्वारे जनजागृती
प्लॅस्टिकबंदीनंतर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आली हे सर्वसामान्यांना कळले आहे.मात्र प्लॅस्टिक तसेच थर्माकोलच्या नेमक्या कोणत्या वस्तूंवर प्रतिबंध आला आहे याची निश्चित माहिती सर्वसामान्यांना नाही.म्हणून प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून येत्या दिवसांत संपूर्ण राज्यभरात जाहिरातींद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या नेमक्या कोणत्या उत्पादनांवर बंदी आणली आहे हे जनतेला माहिती करून देण्यात येणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.