प्रवेशाला मुकण्याची भीती
सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धत आणि मूल्यमापन पद्धत सारखी नसताना या सर्वाना एकाच स्तरावर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे गुण जास्त असल्याने त्यांना अकरावीच्या प्रवेशात प्राधान्य मिळून राज्य मंडळाचे विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांना मुकण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत.
राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा दहावीच्या परीक्षा पद्धतीत बदल झाला आहे. गणित व शास्त्र विषय वगळता अंतर्गत गुण बंद करून कृतिपत्रिकांची पद्धत अमलात आल्याने दहावीच्या निकालातील गुणफुगवटा आटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले असल्याने त्याचा परिणाम अकरावीच्या प्रवेशांवर होण्याची शक्यता आहे. ‘सीबीएसई व आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांत ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या परीक्षांत विद्यार्थ्यांना २० पैकी अंतर्गत गुण मिळत असल्याने त्यांची टक्केवारी जास्त आहे. तर राज्य मंडळाने अंतर्गत गुण बंद केल्याने विद्यार्थ्यांचे गुण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी होत आहे,’ असे पालक प्रा. डॉ. डी. डी. कुंभार यांनी सांगितले.
तातडीने उपाययोजना करावी; अन्यथा न्यायालयात दाद
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, अशा मनस्थितीत काही पालक आहेत. त्या दृष्टीने काही वकिलांशी चर्चाही करण्यात येत आहे.
राज्य मंडळाच्या परीक्षा पद्धतीतील फरक हा सरकारच्या धोरणाचा भाग आहे. त्याशिवाय बदललेली परीक्षा पद्धती विद्यार्थिकेंद्रीच आहे. दहावीचा निकाल अजून जाहीर व्हायचा आहे, त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण कमी होतील असे आताच म्हणणे योग्य नाही. राज्य मंडळ आणि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा फरकाचा प्रवेशांवर काहीही परिणाम होणार नाही.
– मीनाक्षी राऊत, अध्यक्षा, केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समिती