प्रदूषणकारी उद्योगांना हरित लवादाचा हिसका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/pollution-1.jpg)
- दंडाची रक्कम भरण्याचे कंपन्यांना आदेश
पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा दोषारोप ठेवत राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरच्या प्रदूषणकारी उद्योगांना त्याची भरपाई म्हणून कोटय़वधी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यात बडय़ा कंपन्यांना प्रत्येकी एक कोटी, मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांना ५० लाख आणि लघुउद्योजकांना २५ लाख रुपये तसेच सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने महिनाभरात १० कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या भागातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली आहे.
अखिल भारतीय मांगेला समाज व इतर संस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित संस्थाविरुद्ध तारापूर औद्योगिक क्षेत्रातील योग्य पद्धतीने प्रक्रिया न केलेले सांडपाणी नवापूर येथे अरबी समुद्रात सोडले जात असल्याने त्या भागातील जल स्रोत- साठे व मच्छीमार समुदायावर विपरीत परिणाम झाल्याची तक्रार राष्ट्रीय हरित लवादाचे मे २०१६ मध्ये केली होती. या प्रदूषित सांडपाण्यामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तसेच जलीय पर्यावरणची हानी झाल्याचे या तक्रारीत उल्लेखित होते. या याचिकेची २६ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असता लवादाने संबंधित आदेश दिले.