पुराव्याअभावी सर्व निर्दोष सोहराबुद्दीन चकमक प्रकरण
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात येथील सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती या तिघांच्या बनावट चकमक प्रकरणातून तब्बल १३ वर्षांनी २१ पोलिसांसह (यात गुजरात-राजस्थानमधील पोलिसांचा समावेश) आणखी एकाची विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.
खटला चालवण्यात आलेल्या २२ आरोपींनीच सोहराबुद्दीन, कौसर बी आणि प्रजापती या तिघांच्या बनावट चकमकीचा कट रचला आणि त्यात सहभागी होऊन कटाची अंमलबजावणी केली या आपल्या आरोपांना बळकटी देणारे पुरावे सादर करण्यात सीबीआय अपयशी ठरली, असे निष्कर्ष नोंदवत विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सुनील शर्मा यांनी सीबीआयच्या तपासावर ताशेरे ओढले. सोहराबुद्दीन, कौसर बी आणि प्रजापती यांची गोळ्या झाडून हत्या झाली हे सत्य आहे. त्याचे वैद्यकीय पुरावेही आहेत. तरी खटल्यादरम्यान जो पुरावा पुढे आला तो लक्षात घेता या २२ आरोपींचा या चकमकीशी संबंध नाही वा त्यांना त्यासाठी दोषी धरता येऊ शकत नाही हेच निष्पन्न होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
गुजरात स्थानिक पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग आणि सीबीआय अशा तीन पातळ्यांवर सोहराबुद्दीन, कौसर बी आणि प्रजापती यांच्या बनावट चकमकीचा तपास करण्यात आला. मात्र त्यानंतरही आरोपींनीच ही हत्या घडवून आणल्याचे पुरावे न्यायालयासमोर आणण्यात तपास यंत्रणांना अपयशी ठरल्या; किंबहुना आरोपींना दोषी ठरवावे असा एकही समाधानकारक पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही, असा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे. त्याच वेळी सीबीआयला या प्रकरणी पूर्ण दोषी ठरवण्यात अर्थ नसल्याचेही न्यायालयाने या वेळी प्रामुख्याने स्पष्ट केले.
दोषमुक्त केल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा यांना खटल्याला सामारे जावे लागले नसले तरी निकाल देताना न्या. शर्मा यांनी त्यांना या कटाची माहिती होती असे म्हणणे योग्य होणार नाही, असे नमूद केले. आयपीएस अधिकारी आशीष पंडय़ा हे सुट्टीवर असतानाही प्रजापती बनावट चकमकीसाठी वंजारा यांनी त्यांना संपर्क साधून बोलावून घेतले होते, असा सीबीआयचा आरोप होता. मात्र वंजारा आणि पंडय़ा यांच्यात याच मुद्दय़ाबाबत फोनवरून संभाषण झाले होते याचा ठोस पुरावा सादर केला गेला नाही. त्यामुळेच वंजारा यांना चकमकीच्या कटाबाबत सगळे माहीत होते हा निष्कर्ष काढता येऊ शकणार नाही, असेही न्या. शर्मा यांनी प़्रामुख्याने स्पष्ट केले. हा निकाल निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने या वेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तसेच निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचेही स्पष्ट केले.
- दुपारी १२ वाजता न्या. शर्मा यांनी या प्रकरणाचा निकाल काय आहे हे हिंदूीतून सांगण्यास सुरुवात केली. २२ आरोपींविरोधात्समाधानकारक पुरावे सादर केले गेले नाहीत. त्यामुळे आरोपींना दोषी ठरवता येऊ शकत नाही, असे त्यांनी आधी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी सीबीआयचे पुरावे किती कमजोर होते हे सविस्तर सांगितले. निकालाची तोंडी मीमांसा विशद केल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी न्या. शर्मा यांना आरोपींना त्यांच्याबाबत काय निर्णय देण्यात आला हे सांगण्याची विनंती केली. त्यानंतर न्या. शर्मा यांनी अखेर आरोपींना त्यांची सगळ्या आरोपांतून निर्दोष सुटका झाल्याचे सांगितले