पाणी पिण्याची आठवण व्हावी यासाठी शाळांमध्ये वाजवली जाणार तीन वेळा वॉटर बेल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-88.png)
मुंबई | महाईन्यूज |
राज्यातील शाळांमध्ये आता 26 जानेवारी पासून शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन होणार आहे त्याच सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासात आणखी एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. शारिरिक तसंच बौद्धिक वाढीसठी रोज मुलांनी दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे…त्यासाठी आता वॉटर बेल उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुलं शाळेत दिवसातील 5 ते 7 तास असतात. या काळात त्यांना दीड ते दोन लीटर पाणी पिणं आवश्यक असते. मात्र, मुलांना पाणी पिण्याची सवय नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी म्हणून शाळेच्या वेळापत्रकात आता तीन वेळा वॉटर बेल वाजवण्याची वेळनिश्चिती करण्यात येणार आहे. तसे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Water_Bell2-1.jpg)
शाळेतील अनेक विद्यार्थी घरातून नेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या अनेकदा तशाच घरी आणतात आणि दिवसभरात शाळेत खूप कमी पाणी अनेक विद्यार्थी पीत असल्याचं निदर्शनास आले. पालकांच्याही याच तक्रारी आहेत त्यामुळे शाळेमध्ये पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी हाउपक्रम राबवण्यात येणार आहे. सोबतच या उपक्रमाचा अहवाल शालेय शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व शाळांकडून घेतला जाणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/dc-Cover-qi3vmnei3bjkei2sgoaht4aml4-20191115012627.Medi_.jpeg)
अनेकदा वर्ग सुरु झाल्यानंतर शिक्षक स्वच्छतागृहात पाठवत नसल्याने विद्यार्थी पाणी पित नसल्याचे समोर आलं आहे.या कारणास्तव या वेळांमध्ये शाळांनी मुलांना स्वच्छतागृहे वापरण्याचीही मुभा द्यावी, असे परिपत्रकात नमूद केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा भरण्याची आणि सुटण्याची सूचना देणारी घंटा आता विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठीही वाजवण्यात येणार आहे.