पहिल्याच दिवशी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग
![Chance of cloudburst in Ratnagiri, forecast by meteorological department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rain-and-storm-1.jpg)
- कोकणात जनजीवन विस्कळीत : 36 तासांत अतिवृष्टीचा इशारा;
- अनेक ठिकाणी वीज खोळंबली
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह संपूर्ण ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसाने कोकणाला पावसाचा मोठा तडाखा बसला असून मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळित झाले आहे.कोकण किनारपट्टीला उधाण आल्याची स्थिती सध्या आहे.
सिंधुदुर्गात जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून व मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे, भिंती कोसळून मोठे नुकसान झाले. सायंकाळी उशीरा पावसाचा जोर आणखीनच वाढला होता. वादळी वाऱ्याचा सर्वांत जास्त फटका सावंतवाडी तालुक्याला बसला आहे. देवगडसह मालवण, वेंगुर्ला भागातील वीज झालेल्या पावसामुळे गायब झाली. येत्या 48 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दिवसभरात झालेल्या संततधार पावसामुळे नदी- नाल्यांना मोठे पाणी वाहत होते. अद्यापही झालेल्या पावसात मोठे पुराचे पाणी जाईल एवढा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील काही भाग अंधारात आहे.
चिपळूण जवळ महामार्गावर झाड पडल्याने काही काळ महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत काल पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी आले होते. यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे.
दरम्यान पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी भागात येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला असून सागर किनारपट्टी भागातील व पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
काल मध्यरात्री पासून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि कोयना नगर भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. उर्वरित जिल्ह्यात संततधार कायम आहे. तसेच सांगली शहरासह ग्रामीण भागात पावसाने तुरळक हजेरी लावली आहे . कोल्हापुरात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस असून राधानगरी धारण आणि गगनबावडा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर शहरात संततधार कायम आहे. येत्या पश्चिम महाराष्ट्रा सह कोकण किनारपट्टी भागात येत्या 36 तासांत अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे.