नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षा महिन्याभरात घेण्यात येणार; पदवी प्रमाणपत्रावर कोविडचा शेरा नसणार- उदय सामंत
कोरोनामुळे यंदा अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत तर अनेक पुढे ढकलण्यात आल्यात. यात अंतिम वर्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागण्यास सुरुवात होणार आहे. यात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षा त्वरित महिन्याभरात परीक्षा घेण्यात येणार असल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही. यामुळे सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.
“अंतिम वर्षातील 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. तर उरलेले 10 टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
“या पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोव्हिड 19 असा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षीप्रमाणेच दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणाताही संभ्रम ठेवू नये.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
“या प्रमाणपत्राचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. या पदवीकडे जर कोणी बघत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी,” असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून कोविड शेरा बाबतीत त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी झाली आहे.