नातेवाईकाच्या भेटीसाठी गावी जाणारे आई, वडील आणि मुलगा ट्रक-कारच्या अपघातात ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/A-Gallery_1-2.jpg)
वाशीम, महाईन्यूज
नातेवाईकाच्या भेटीसाठी गावी जाणारे आई, वडील आणि मुलगा ट्रक-कारच्या अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर-औरंगाबाद महामार्गावर चांडस नजीक घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील सावरगांव बर्डे येथील मूळ रहिवासी आणि सद्यस्थितीत वाशिम इथं वास्तव्यास असलेले किसन कड ( वय 71 ), जिजाबाई कड ( वय 62 ) आणि मुलगा अमोल कड (वय 30 ) हे तिघे जण डोणगांव इथे मुलगा अमोल कड यांच्या पत्नीचे माहेरकडील नातेवाईक आजारी असल्याने त्यांच्या भेटीसाठी कारने जात होते.
चांडसजवळ पोहोचले असता अचानक भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई,वडील आणि मुलगा हे जागीच ठार झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला.
अपघात घडताच चांडस येथील ग्रामस्थ मदतीसाठी तात्काळ धावून आले. मात्र तो पर्यंत कार मधील तिघांचा मृत्यू झाला होता.ज्ञअमोल कड हे पेशाने वकील होते तर त्यांचे वडील किसन कड हे सेवा निवृत्त बँक अधिकारी होते. अमोल कड यांची पत्नी आणि छोटा मुलगा अगोदरच डोणगांव इथं गेले होते. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे वाशिम जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
अपघात घडताच शिरपूरचे पोलीस उपनिरीक्षक शरद साठे आणि कर्मचारी दाखल झाल्यानंतर रस्त्यावरील वाहनं हटविण्यात आली आहेत. अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.