नागुलगावात एका कुटुंबियांना बेदम मारहाण, तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/A-Gallery_16.jpg)
– सहा ते सात तरूणांचा मारहाणीत समावेश
– शिराठोण पोलिसांचे गुन्हेगारांना अभय
उस्मानाबाद | महाईन्यूज
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू असताना कळंब तालुक्यातील नागुलगाव येथे सहा ते सात तरूणांचे टोळके शेतातील विहीरीत पोहत होते. दरम्यान, त्यांना समजवून सांगण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेशी हुज्जत घालत तरुणांच्या टोळक्याने ज्येष्ठ महिला, पती, मुलगा आणि सुनेला जबर मारहाण करून ज्येष्ठ महिलेला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हेगार तरूणांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात गेले असता, शिराठोण पोलिसांनी त्यांच्याशी उध्दटपणे वर्तणूक केली. या घटनेला तीन दीवस उलटतात तरी अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील नागुलगाव येथे भाऊराव माने (वय ६५) यांच्या शेतात समाईक विहीर आहे. या विहिरीचे पाणी शेतीउपसा आणि पिण्यासाठी वापरले जाते. मंगळवारी (दि. ३१) दुपारी सहा ते सात तरूण या विहिरीत पोहत होते. सध्या कोरोना सदृश्य परिस्थिती असल्याने देशभरात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू आहे. जमावबंदी आदेशानुसार पाच व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते. मात्र, याठिकाणी हे आठ तरूण नियमांचे उल्लंघन करून एकत्र पोहत होते. त्यांना समजावून सांगण्यासाठी सखुबाई भाऊराव माने (वय ५०) विहिरीवर गेल्या. सरकारने आदेश काढला आहे, तरी तुम्ही विहिरीत पोहत आहात. आम्ही विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरतो, तरी तुम्ही पोहू नका. अशी विनवणी केली असता पोहत असलेल्या तरूणांनी अत्यंत खालच्या पातळीतील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पोहत असलेले तरूण विहिरीच्या बाहेर धावत आहे. सखुबाई माने यांच्याशी अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. त्यांच्याशी झोंबाझोंबी केली. त्यांना वाचवण्यासाठी पती भाऊराव, मुलगा संतोष आणि सून आश्विनी त्याठिकाणी धावत आले. त्या तरुणांनी सर्वांनाच मारहाण करायला सुरुवात केली. तरूणांच्या टोळक्याने महिलांना सुध्दा बेदम मारहाण केली. तिघांनी सखुबाईंना ओढत नेहून विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. संतोष यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांची पत्नी आश्विनी यांना देखील साडीचा पदर ओढून मारहाण केली. त्यांच्या पायावर गंभीर जखम झाली आहे. तर वडिलांना सुध्दा गंभीर दुखापत झाली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/a-gallery_171200400465324729259.-1024x576.jpg)
वर्दीतील लाचारीमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात
दरम्यान, माने कुटुंबीय तक्रार देण्यासाठी शिराठोण पोलीस ठाण्यात गेले. तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांनी त्यांच्याशी उध्दटपणे वर्तणूक केली. रितसर गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. या घटनेला आज तीन दिवस होतात. अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. पोलिसांचे पाठबळ मिळत असल्यानेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरूणांची मर्दुमकी वाढत चालली आहे. आम्ही पोलिसांना हप्ते देतोय, आमचे काहिही वाकडे होणार नाही. अशा शब्तांत गुन्हेगारांकडून आव्हान दिले जात आहे. वर्दीतील लाचारीमुळे सामान्य कुटुंबातील महिलेची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरम्यान, तरुणांचा सामुदायिक बेकायदेशीर दारू विक्रीचा धंदा असल्याची माहिती मिळाली आहे.