नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अन् देशाचा भ्रमनिरास केला”; एकनाथ खडसेंनी ‘ते’ रिट्विट केलं डिलीट
![BJP believes in implementation of declarations, not just declarations: Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Narendra-Modi-15.jpg)
मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी जळगावात खडसे समर्थकांनी जोरदार तयारी केली असून भाऊ तुम्ही सांगाल ते धोरण अन् बांधाल ते तोरण अशाप्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुंबईत २२ ऑक्टोबर रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी खडसेंच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला येण्याची तयारी सुरु केली आहे.
एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर खडसेंना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारच्या मोदी भाषणावर टीका करणारं ट्विट केलं होतं, यात लिहिलं होतं की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र उत्सुकता म्हणजे एकनाथ खडसेंनी हे ट्विट रिट्विट केलं होतं, परंतु काही काळातच एकनाथ खडसेंनी रिट्विट डिलीट केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/clipboard01kslaoslapaa_202010507945.jpg)
एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्तही ठरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खडसेंबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं, मागील वेळी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडेही तेव्हा पक्षाच्या सक्रीय कार्यातून बाहेर पडल्या होत्या. पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्न केला, त्यावर पंकजा म्हणाल्या की, चर्चा चर्चा असताच जोपर्यंत सत्यात उतरत नाही, चर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? मला वाटत नाही खडसेसाहेब पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील असं त्यांनी प्रतिक्रिया दिली.