धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड – संभाजी भिडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sambhaji-bhide.jpg)
जळगाव : मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही’, असं म्हणत श्री शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचं समर्थन केलं. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याची टीका संभाजी भिडे यांनी केली. नंदुरबारमधील धर्मसभेत ते बोलत होते.
राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावर भिडे यांनी हिंदू धर्मातील स्त्री-पुरुषांवर जळजळीत टीका केली. ‘हिंदू स्त्री-पुरुष हे राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक आहेत,’ असं ते म्हणाले. ‘पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रू देशांविरोधात एकजुटीने उभं राहण्याची आवश्यकता आहे. पण तसं होत नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात एकीकडं भारतीय जवान शहीद होत असताना दुसरीकडं आपण पाकशी क्रिकेट सामने खेळतो. त्यांना सणासुदीला मिठाई देतो, हे चुकीचं आहे,’ असं भिडे म्हणाले.