देशसेवेचे स्वप्न अपुरे, व्यायामास जाताना तीन मुलांना वाहनाने चिरडले
![Shocking! Horrific accident in Gujarat; Ten members of the same family were killed when a truck hit a car](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/accident-1-2.jpg)
पहाटे व्यायामास जाणाऱ्या तीन तरूणांना शनिवारी एका भरधाव कारने चिरडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळेवाडीत ही घटना घडली आहे. अपघाती मृत्यू झालेल्या तिघांनाही सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. पण त्यांच्यावर काळाने घाला घातला.
सुनिल प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (१६) व अभिषेक भगवान जाधव (१४) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. जय भवानी हायस्कूल गढी येथे शिक्षण घेत होती. घटनेची माहिती समजताच तळेवाडी गावावर शोककळा पसरली असून गावात एकही चूल पेटली नाही.
सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिघेही पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान कल्याण – विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तिघांनाही पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गावातील काही तरुण सैन्यात भरती आहेत. ते सुट्ट्यात गावी आले असता तिघेही त्यांना आम्हाला सैन्यात भरती व्हायचे आहे, देशसेवा करयाची आहे असे म्हणत, असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.