दिलासादायक! बळीराजा सुखावला, महाराष्ट्रात सरासरीच्या 97.7 टक्के पाऊस
नागपूर: राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 97.7 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. राज्यातील समाधानकारक पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत राज्यातील तब्बल 189 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. तर राज्यातील 93 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100 टक्के पावसाची नोंद झालेली आहे.
अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद विभागावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. या विभागात आतापर्यंत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसानं चांगली बॅटिंग केल्यामुळे, खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, भुगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासही पावसाचा चांगलाच फायदा झालेला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याने राज्यातील अनेक धरण ओव्हरफ्लो झालेले आहेत. त्यासोबत पावसामुळे काही नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे. धरणातील पाणी साठ्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.