…तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला सुरक्षेची गरज नाही; चंद्रकांत पाटील यांनी सरकारला सुनावले
राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकासआघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही, चंद्रकांत पाटील म्हणाले.
आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलीस जवानंना वगळण्यात आलं आहे, त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. तसेच, सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच असल्याचे ते म्हणाले. पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.