तत्कालीन फडणवीस सरकारनं अन्वय नाईक प्रकरण दाबलं, त्यासाठी मंत्रालयात मिटींग घेतली – अनिल देशमुख
![Sanjay Rathore will be questioned as per rules, testimony of Anil Deshmukh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images_1591867918989_anil_deshmukh.jpg)
मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं. नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा गंभीर आरोप केला. अर्णव गोस्वामी यांनी मला पैसे न दिल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट अन्वय नाईक यांनी लिहिली होती. या आत्महत्येनंतर मागच्या सरकारने अन्वय नाईक प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालयात मिटिंग घेतली होती. नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप देशमुख यांनी केला. पत्रकार अर्णव गोस्वामींना वाचवण्यासाठी नाईक आत्महत्या प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेल्याचं नाईक यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही कारवाई सुरू केली आहे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारकडून ईडी आणि इतर यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे, असं ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी प्रकरण लावून धरलं होतं. नाईक कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. त्याशिवाय त्यांनी केद्र सरकारला वारंवार धारेवर धरलं. ते सतत प्रश्न विचारत असल्याने राजकीय सुडापोटीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. सरकार सुडाने काम करतं हा विरोधकांचा आरोप असून आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे. त्यांना त्यांचं काम करू द्या, पण आम्ही कुणावरही सुडाने कारवाई केली नाही. जे तथ्य आमच्या समोर येते, त्यानुसार निर्णय घेतो, असंही ते म्हणाले.