टिळक नगर येथील पादचारी पूल पाडण्याचा निर्णय
- अंधेरी दुर्घटनेनंतर रेल्वेचा खबरदारीचा उपाय
अंधेरी दुर्घटनेनंतर रेल्वेने शहर, उपनगरांमधील धोकादायक उड्डाण पूलांचे सर्वेक्षण सुरू केले असून हार्बर मार्गावरील टिळकनगरचा जुना पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. मेगाब्लॉक घेऊन हा पूल पाडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
रेल्वे आणि महापालिकेने संयुक्तपणे शहर, उपनगरातील तब्बल ४४५ पूलांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. गुरूवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या सर्वेक्षणात आयआयटीतील तज्ज्ञ आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्या, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. रूळांवरून गेलेल्या पादचारी किंवा उड्डाण पूलांची सद्यस्थिती, संभाव्य आयुर्मान याचा अभ्यास करून डागडुजी, प्रतिबंधात्मक उपाय किंवा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, मध्यरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी टिळकनगर येथील रेल्वे रूळांवरून गेलेला मात्र सध्या उपयोगात नसलेला पादचारी पूल पाडण्याचा निर्णय घेतला.
स्थानक प्रबंधक निलंबीत
अंधेरी येथील पूल कोसळल्यानंतर लोकलला रुळ बदलण्याचा चुकीचा संकेत देत भयंकर अपघाताला आमंत्रण दिल्याचा आरोप ठेवत अंधेरीच्या स्थानक प्रबंधकाला पश्चिम रेल्वेने निलंबीत केले. हार्बर मार्गावरून वांद्रेहून अंधेरीकडे निघालेल्या लोकलला भाईंदरच्या दिशेने जाण्याचा सिग्नल देण्यात आला. लोकलच्या मोटरमनने हा चूकीचा सिग्नल आहे हे ओळखले होते.