जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थाना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला दिलासा
![Marathi Language University to be established in the state - Higher and Technical Education Minister Uday Samant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Uday-samant.jpg)
मुंबई – विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. त्यातच, जेईई परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे, या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत.
शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे, पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेसाठी हजर राहता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. मात्र, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काळजी न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.
”विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे उद्यापासून म्हणजेच आजपासून होणारी जेईई मुख्य परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. याबाबत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना विनंती केली आहे. ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली असून विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये”, असे ट्विट सामंत यांनी केले आहे.