चाकणमध्ये भरधाव कारने पाच जणांना चिरडले
चाकण येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पाच जणांना चिरडले असून या अपघातात कारचालकही जखमी झाला आहे. चंद्रशेखर सुरजलाल विश्वकर्मा, सुनील शर्मा, दिपणारायन विश्वकर्मा, सत्यवान पांडे, सरवज्ञ संजय विश्वकर्मा अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सुहास शेवकरे असे आरोपी चालकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास चाकण केएसएच लॉजिस्टिक्स खालूम्बरे येथे पाच जण रस्त्याच्या कडेला थांबले होते. ते दुचाकीवर थांबले होते. या दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने पाच जणांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कारचालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.