चंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी शिंदेवाही तालुक्यातील गडबोली गावात ही घटना घडली. याच गावात चार दिवसांपूर्वी बिबट्याने एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर हल्ला करुन तिला ठार केले होते. त्यानंतर वन खात्याने पिंजरा लावून त्या बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, आज पुन्हा नवा हल्ला झाल्याने या गावाजवळ आणखी एक बिबट्या होता हे स्पष्ट झाले आहे.
गयाबाई हटकर (वय ५५) असे या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पहाटे त्या आपल्या झोपडीवजा घरात झोपलेल्या असताना एक बिबट्या त्यांच्या घरात शिरला आणि हल्ला करुन ठार केले त्यानंतर त्याने मृत शरीर जंगलात ओढून नेले. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी ही माहिती दिली. गयाबाईंच्या तिन्ही मुलींची लग्न झाली आहेत. त्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या झोपडीवजा घराला दरवाजा नव्हता.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात निषेध आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, ब्रह्मपुरीचे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि समाजिक कार्यकर्त्या परोमिता गोस्वामी यांनी या गावाला भेट दिली. यावेळी वडेट्टीवार यांनी मृत महिलेचे पार्थीव अंत्यसंस्कारासाठी नेण्यास विरोध केला, जोपर्यंत नागपूर येथील वनविभागाचे अधिकारी या गावाला भेट देत नाहीत आणि लोकांची मागणी ऐकून घेत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. इंडिअन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
आजच्या हल्ल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात जंगली श्वापदांकडून झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. यांपैकी ८ नागरिक हे एकट्या ब्रम्हपुरी वनविभागातील आहेत.