गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा 162 विशेष ट्रेन्सना अल्प प्रतिसाद
मध्य रेल्वेने कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 162 विशेष ट्रेन्स सुरु केल्या आहेत. 15 ऑगस्टपासून या ट्रेन्स सोडण्यात येणार होत्या. त्यातील पहिली ट्रेन काल रात्री 8.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरीला रवाना झाली. मात्र या विशेष ट्रेन्संना चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. या प्रवासात केवळ 30 प्रवासी होती. LTT वरुन केवळ 6 प्रवाशांना घेऊन गाडी रवाना झाली. तर ठाणे आणि पनवेल येथून केवळ 25 प्रवाशांनीच आरक्षण केले होते.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोकणात जाण्यासाठी रेल्वे कधी सोडणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. मात्र प्रत्यक्षात गाड्या सुरु केल्यानंतर त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. विशेष ट्रेन्सचे 22 ऑगस्टपर्यंत केवळ 25% आरक्षण झाले आहे. विलगीकरण नियम यामुळे यंदा चारकमान्यांनी कोकणात जाणे टाळले असावे. तसंच ट्रेन्स लवकर सोडण्यात आल्या असत्या तर कदाचित चांगला प्रतिसाद मिळाला असता. तसंच अनेकांनी कोकणात जाण्यासाठी खाजगी वाहनांना पसंती दिली आहे.
पहिल्याच ट्रेनला थंड प्रतिसाद असला तरी यापुढील ट्रेनला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात कोकणात 162 ट्रेन्स सोडण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक स्टेशनवर जिल्हा प्रशासनाचे काही कर्मचारी उपस्थित असणार आहेत. ते येणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवतील.