कॉंग्रेसचं आणखी एक आश्वासन, एका वर्षात 22 लाख युवकांना रोजगार देणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/rahul-gandhi_2017099942.jpg)
नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकार युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. जर, केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं, तर एका वर्षाच्या कालावधीत 22 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्यात येईल. पुढील वर्षाच्या 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे.
Today, there are 22 Lakh job vacancies in Government.
We will have these vacancies filled by 31st March, 2020.
Devolution of funds from the Center to each State Govt for healthcare, education etc. will be linked to these vacant positions being filled.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 31, 2019
भाजपाला अडचणीत आणण्यासाठी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रयत्न करत आहे. रविवारी रात्री राहुल गांधी यांनी ट्विट करत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. आता जवळपास 22 लाख सरकारी पदे रिक्त असून जर भविष्यात काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर 31 मार्च 2020 पर्यंत ही सगळी पदे भरली जातील असा दावा राहुल गांधी यांनी ट्विट करत केला आहे. याआधीही काँग्रेसकडून गरिबांसाठी न्याय योजना घोषित केली आहे. देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देण्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
विजयवाडा येथील सभेत रविवारी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संविधान संपवण्याचा डाव करत आहे. संविधान संपवणे हे आरएसएसचं स्वप्न आहे. मात्र, काँग्रेस पक्ष संविधान संपवण्याचा डाव उधळून लावेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. राहुल गांधी सध्या देशातील विविध भागात जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. प्रत्येक मुद्द्यावरुन राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. राफेल, नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.
आदिवासी, दलितांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अल्पसंख्याक भितीच्या सावटाखाली जगत आहे. देशात सध्या दहशतीचं वातावरण आहे. लोकशाहीमध्ये स्वायत्त संस्थांवर दबाव आणला जातोय हे देशासाठी धोकादायक आहे. आरएसएस आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकशाहीला बंधक बनवलं जात आहे. कायदा हातात घेत जीव घेण्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. देशात लोकशाही संपविण्याचा डाव हळूहळू सुरु आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी भाजपा आणि आरएसएसवर केला.