केंद्रानं तात्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी; बाळासाहेब थोरात यांची मागणी
![Balasaheb Thorat Congress oppose rename of Aurangabad to Sambhajinagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Balasaheb-Thorat.jpg)
“करोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे आणि रोजगाराचे केंद्र आहे. पण केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्ये जी अडचणीत आली आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही,” असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. केंद्र सरकारकारने तात्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.
“महाराष्ट्रासह इतर राज्ये करोनाचा मुकाबला करत आहेत त्यांना केंद्र सरकारने भरीव मदत केलीच पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे,” असे थोरात म्हणाले. एकेठिकाणी भाजप नेतृत्व महाराष्ट्राचे आर्थिक महत्त्व कमी करून महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय वित्तीय केंद्रासारखे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जात आहे. तर दुसरीकडे काँग्रसचे नेते प्रत्येक राज्याचे महत्त्व जाणतात. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान किती मोठे योगदान आहे. याची जाणीव काँग्रेस नेतृत्वाला आहे. गेल्या सत्तर वर्षात देशाचे नेतृत्व केलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांनी सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहिले. पण दुर्देवाने सध्याच्या भाजप नेतृत्वाकडून गेल्या सहा वर्षात न्यायाची भूमिका घेतली गेली नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील स्थलांतरित मजूर, गरीब, मध्यमवर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्याच्या केलेल्या मागणीचा केंद्र सरकारने विचार केलाच पाहिजे यातूनच देशात मागणी वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” असंही ते म्हणाले.