काँग्रेसच्या चार मंत्र्यांनी केला अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाचा दौरा
मुंबई – मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. काँग्रेसच्या चार मंत्र्यांनी आज अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाचा दौरा करून शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतक-यांशी संवाद साधला व सरकार आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका असा धीर दिला.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. या दौ-यात त्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली व त्यांना धीर दिला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिका-यांच्या बैठका घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी आज नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन आढावा घेतला.
यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की हे वर्षे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष असेल दुर्देवाने म्हणावे लागत आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील काही भाग वगळला तर शेतकऱ्यांना खूप काही सहन करावे लागले आहे. कोकणातील चक्रीवादळामुळे सर्वप्रथम तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने सातशे कोटी रुपयांची मदत उभी केली. त्यापाठोपाठ आताचे हे नुकसान लक्षात घेता आम्ही केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली आहे. याबाबत त्यांना लेखीही कळविले आहे. आम्ही आमच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदतीला तत्पर असून वेळप्रसंगी कर्ज काढायची वेळ जरी आली तरी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी रविवार १८ ऑक्टोंबर रोजी केली. उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील कवठा व लातूरच्या औसा तालुक्यातील उजनी येथे शेतक-यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा व अडचणी समजून घेतल्या व राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका, असा धीर दिला. यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने दिलेली निवेदने त्यांनी स्विकारली.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील, यांच्यासह लोकप्रतिनिधी उस्मानाबाद व लातूरचे जिल्हाधिकारी त्यांच्यासोबत होते.