औरंगाबादेतील घटना, चोरांनी चक्क एटीएमच चोरुन नेले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/ATM.jpg)
औरंगाबाद – चोरांनी चक्क एटीएमच चोरुन नेल्याची घटना घडली आहे. बीड बायपासवरील दत्त मंदिर समोर एसबीआयचे हे एटीएम मशीन होते. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यामधून लाखोंची रक्कम लंपास झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय झाले आहेत. बायपासवरील दत्त मंदिरासमोर भारतीय स्टेट बॅंकेचे अनेक वर्षापासून एटीएम सेंटर आहे. वर्दळीचे ठिकाण असूनही ही चोरीची घटना घडली आहे.
सेंटरवर दोन एटीएम आहेत, परंतु येथे सुरक्षारक्षक नसतो. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी रोकड लुटण्यासाठी चक्क एक मशीनच चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. एटीएममध्ये किती रोकड होती याची माहिती मिळू शकली नाही. मात्र स्थानिकांच्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारीच मशीनमध्ये रक्कम जमा करण्यात आली होती. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आपल्या पथकासह पुढील तपास करत आहेत.